Friday, February 16, 2024

                       संसार तो झाला मोक्ष-मय



गुरुमाऊलींनी मायेच्या ममतेने अंगाईगीता सारख्या   गोड शब्दांत आपल्याला सांगितलंय:-



“करीं च काहीं त्वरा जोंवरी जरा-मरण तें दूर जरा न नजरानजर जाहली तोंच पालटे नूर ॥जोंवरी न ती कानीं आली काळाची आरोळी। मोह जाळुनी होई मोकळा कर वाजवुनी टाळी॥ असे सहज परी सोsहं भावें करी सतत अभ्यास । हीच साधना जोंवरी न तो झाला मोह निरास” ॥अमृतधारा सा. ९१-९२-२५॥

जरा हा शब्द प्रथम वृद्धावस्था तर नंतर क्षणिक या अर्थाने योजिला आहे. वृद्धावस्थेत अंथरुणाला खिळून रहावं लागलं तरी खिन्न वा उदास होऊं नये म्हणून सद्गुरु वेळीच सावध व्हायला सांगत आहेत. पुढे ९२ व २५ मधे मोह नष्ट करण्यासाठी स्वामी सोपी साधना म्हणून सतत सोsहं भावात राहायला, सोsहं चं अनुसंधान ठेवायला सांगतात.स्वामी पुढे सांगतात “अन्तरांतुनी सहज ध्वनि तो निघतो सोsहं  सोsहंविनाश्रवण ऐकतां तोषतो माझाआत्माराम”॥अधा.१४७ स्वामी स्पष्ट संकेत देतात की  सोsहं हा अन्तरांतील ध्वनि आहे व तो विनाश्रवण, मनाच्या कानांनी,सर्वांगाचे कान करुन ऐकायचा आहे. चिंतना साठी घेतलेल्या अभंगात स्वामी सांगतात -

कृपावंत भला सद्गुरु लाभला ! अंगीकार केला तेणें माझा ॥१॥अंतरींची खूण दाखवोनी मज।सोsहं मंत्र गुज सांगितलें ॥२॥ ठायीं चि लागली अखंड समाधि।संपली उपाधि अविद्येची ॥३॥ स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला।संसार तो झालामोक्ष-मय॥४॥संगा१७ 

इथे लक्षात ठेवलं पाहिजे कीं हा स्वामींचा स्वानुभव आहे व आपल्याला तसा अनुभव हवा  तर स्वामींनीं सांगितलेलं सहज साधन नित्य-नेमाने केले पाहिजे. पण आपण छोट्याछोट्या मोहात पडतो. “गीताई” चे  लेखक आचार्य विनोबा भावे यांचा गीता व्यासंग सर्वश्रुत आहे. मोक्ष संकल्पनेवरील त्यांचं उत्तर अत्यंत समर्पक व उद्बोधक आहे मोहाचा क्षण टाळणे हाच मोक्ष


चर्पटपन्जरिकास्तोत्रम् च्या सहाव्या चरणात आदि शंकराचार्य लिहितात- “अंगं गलितं पलितं मुण्डं । दशनविहीनं जातं तुण्डम् । वृद्धो याति गृह्वीत्वा दण्डं । तदपि न मुंच्तत्याशा पिण्डम् । भज गोविंदम् भज गोविंदम् मूढमते मूढमते ”॥६॥ अशाच आशयचा ज्ञाने.९/५१४वर आधारित स्वामींचा अभंगः- “जरी तो दर्दुर सर्पमुखीं गेला । तरी आस त्याला मासियेची॥१॥तैसी प्राणियांसी सोडवे तृष्णालागलीसे प्राणा तांत जरी ॥२॥  घडी घडी काळ भक्षितो आयुष्य। परी ह्याचें लक्ष प्रपंचांत ॥३॥ स्वामी म्हणे जीवा होई गा सावधघेई वेगें वेध माधवाचा ”॥४॥सं. गाथा २०८ 

स्वामी भक्ती व स्वरूपानुसंधानाने, जीव ब्रह्मैक्य साधायला सांगतात-

सर्वव्यापी सदा स्वरूपीं ठेवुनियां अनुसंधानमन:कल्पना जाळुनि नाना, करीं असें मद् - यजनवंदन भावें तसें करावें मजसी सर्वांठायींअभेद चित्तें मज एकातें जाणुनि सर्वां देहींजीवात्म्याचा परमात्म्याशीं साधुनियां संयोग । असाचि मत्पर तूंहि निरंतर मत्प्राप्ति-सुखा भोग ! ॥भावार्थ गीता९/१३०,१३१,१३२ ॥ 


अभेद चित्तें मज एकातें जाणुनि सर्वां देहीं  असाचि मत्पर तूंहि निरंतर मत्प्राप्ति-सुखा भोग


आणि या सुखाचा अनुभव आला की मग - 

“स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला। संसार तो झाला मोक्ष-मय” ही अवस्था आपसुकच   प्राप्त  होते. 


प्रेरणास्रोत सोsहं-हंसावतार चैतन्यरूप स्वामींच्या चरणीं ही शब्द-सुमनें सर्वभावें समर्पण. 

माधव रानडे


No comments: