Tuesday, August 15, 2017

                            “सोऽहं-हंसोपनिषद ”
                                अर्थात
     श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यांतील
        ( चाकोरीबाहेरचे ) मराठीतील पहिले उपनिषद
                           ( क्रमश:- २)

हा लेख लिहायला घेताच मला आठवली कवी केशवसुत ह्यांची प्रसिध्द “ तुतारी ” ही कविता ज्यामध्ये ते म्हणतात-
“ एक तुतारी द्या मज आणुनि । फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें । दीर्ध जिच्या त्या किंकाळीने”
कारण श्रीस्वामींच्या साहित्याच्या, तत्वज्ञानाच्या रूपानं मला खुणावत असणाऱ्या या तुतारीत प्रचंड ताकद आहे.
“ सोsहं-हंसोपनिषद ” चं संकलन, संशोधन, संस्करण व अखेर जेव्हां संपादन होईल तेंव्हा ते विश्व-विख्यात होईल. आजच्या संगणक युगांत गति हा परवलीचा शब्द आहे. एखादी संकल्पना नवीन पिढीला भावली तर माहितीचे महाजाल अल्पावधीत ती वाऱ्यासारखी पसरविण्यास सक्षम आहे. श्रीस्वामींच्या साहित्यांतील निवडक संदर्भ जाणीवेच्या नव-विज्ञानाची दालने उघडतील व आधुनिक पदार्थविज्ञानातील पूंजसिद्धांताशी त्यांच्या नात्याचा शोध घेतील.
माझा तुटपुंजा वैयक्तिक अनुभव व तोकडी अभिव्यक्ती याची पूर्ण जाणीव असतांनाही मी असं धाडसी विधान करतोय याचं कारण माझ्या दुबळ्या पंखांना स्वामी योगेश्वरानंद या उच्चशिक्षित नाथसिद्ध योगी, यांच्या आश्वासनाचं बळ मिळालंय. त्यांना योगेश्वर श्रीकृष्णाचा साक्षात्कार झालेला आहे. त्यांनी इंग्रजी व मराठीमध्ये अनेक ग्रंथ लिहिले आहेत. “योगदा ज्ञानेश्वरी” “ एका नाथसिद्ध योग्याचे आत्मवृत्त ” हे त्यातील प्रमुख. त्यांनी “ज्ञानेश्वरी नित्यपाठ ” चं ईंग्रजीत Versification / transliteration केलं आहे.  ते Academia.edu च्या https:/www.academia.edu/2481731/Nityapatha_Dnyaneshwari या link वर आहे
मी त्यांना “ सोsहं-हंसोपनिषद ” च्या, संस्करण, संशोधनासाठी विनंती केल्यावर त्यांनी कळवलं. Quote-
“ I will do what my limited abilities permit.
Between us, and for a few others, I am revealing to you the secret of 'Soham' अनुभूती, as I understand in the context of my exposure to the Swami, and his mystic compositions:
"अन्तरातुनी सहज ध्वनि तो निघतो सोsहं सोsहम । विनाश्रवण ऐकता तोषतो माझा आत्माराम ।। विनावैखरी होत अंतरीं सोsहं शब्दोच्चार । सहज-भजन-अभ्यसन जंव नसे अद्वैती व्यापार ||अमृतधारा/१४८-१४९।।अद्वय भक्ति येतां हातीं सरली यातायाती । बुडतां अमृतीं मरण तरी का संभवेल कल्पान्ती ।।अ.धारा/१५७।।"-
This "Soham" is what is known to the Yogis and mystics as अनाहत नाद. नाभिपासून ब्रह्मरंध्रात उमटणारा हा नाद आहे. लक्षणा आहे- नाभिवर: 'नाभि' म्हणजे 'कंदस्थान'- कुंडलिनी पिंड-निर्मिति केल्यावर विश्राम करते, सुप्तावस्थेत असते, अंशात्मक जागृत राहून देहकार्य चालवते, ते स्थान. हे मूलाधाराखाली असते. नाभि व मूलाधार यांच्याशी संबंधित असते. सुषुम्नेचे खालील द्वार तेथे असते. जागृत कुंडलिनी सुषुम्नेच्या या द्वारातून प्रवेशून पुढे मार्गस्थ होते. तिची अंतिम गति (पिंडसंबंधित) ब्रह्मरंध्रस्थित 'शिव' ही आहे. त्यापुढे ती 'पिंड' ओलांडून विश्वकुंडलिनीत सामावून जाते.
जेव्हा तिचे ब्रह्मरंध्र ते 'नाभिदेश' (कंद) असे आवागमन होत असते, तेव्हा तिला तांत्रिक संज्ञा 'कुलकुंडलिनी' अशी आहे. ती कोणत्याही चक्रावर केव्हाही जाऊ शकते. पण सिद्ध सहसा तिला आज्ञाचक्रावरील प्रांतात ठेवतात आणि जसे कार्य असेल तसे त्याखालील चक्रात उतरवून ते कार्य सिद्ध करून परत आज्ञाचक्रावर जातात. अर्थात यातही केवळ तिचा अंशमात्र खाली उतरतो, पूर्ण नाही. म्हणूनच म्हणतात की सिद्ध पुरूष एकाच वेळी परब्रह्म आणि व्यावहारिक दशा दोन्हीही उपभोगतात.
स्वामींचे वाङ्मय खरेच कळून घ्यायचे असेल तर ते सिद्धांकडूनच समजेल. कारण त्यातील गूढगर्भ अन् मिती नसलेल्या आशयाचे ज्ञान केवळ तेच धारण करतात.
'सोहम' मंत्र जेव्हा दीक्षितास मिळतो तेव्हा कुंडलिनी जागृतीसाठी आवश्यक ती पार्श्वभूमी निर्मिण्यासाठी लागणारी चालना सद्गुरू देतात. साधकाच्या पिंडवॆशिष्ट्यानुसार योग्य काल येताच, automatically कुंडलिनी अंशतः जागृत होते आणि पुढील क्रियांना सुरुवात होते.
अत्यंत प्रगत साधकास पूर्ण कुंडलिनीजागृतीच्या अवस्था अनुभवास येतात. कुंडलिनी जागृति ही 'धर्ममेघ समाधि' ची सुरूवात आहे.
यातच खरी 'सोहम् ध्यानावस्था' आहे. ती परिपक्व होत जाते आणि कुंडलिनी पुढील चक्राक्रमण करत ब्रह्मरंध्री जाऊन शिवात सामरस्य प्राप्त करते. असा हा स्वामींच्या 'सोहम्'साधनेचा खरा भाग आहे.
तो स्वामींनी सगळ्या दीक्षितांना सांगितला किंवा अध्याहृत ठेवला, ते ज्याचे तोच साधक जाणे.
'सोहम्' वाग्जप करत असतांना शास्त्रानुसार पिंडशुद्धी होऊन जेव्हा एक कोटी (लाक्षणिक अर्थाने; म्हणजे अतिशय मोठी संख्या) तेव्हा 'अजपाजप' सिद्ध होतो. तो जसा प्रगत होत जातो आणि पूर्णावस्थेत जाऊन त्याच्याही जेव्हा कोट्यवधी आवृत्ति होतात, तेव्हा 'अनाहत नाद' ऎकू येऊ लागतो. तो जेव्हा सर्व  प्रकारचा (शंख, भेरी, ढोल समुद्रगर्जना इ.इ. सहस्रावधी प्रकारांचा) साधक अनुभवतो, ती अनाहताची पुढील अवस्था आहे.
जेव्हा तो 'अखंड'  (जागृतीकाळात) अनुभवायला येऊ लागतो, तेव्हा त्याची परिणत अवस्था  असते. त्याच्याही सूक्ष्म नाद आणि घोर नाद अशा अवस्था आहेत. योगी (यात भक्तादी इतर सर्व 'मार्गी' पण आलेत) या नादांना 'सगुण' आणि 'निर्गुण' जशी अवस्था असते वेळोवेळी तसे 'सूक्ष्म' ते 'घोर' अशा नादांचा अनुभव घेतो. नाद आणि प्रकाश या परमात्म्याच्या (परब्रह्म, ब्रह्म, परमशिव इ.) अनुभूति आहेत; त्यांच्यातच परमसाक्षात्कार आहे.
तूर्त येवढेच पुरे. आवश्यक त्या स्वामिभक्तांना कळवण्यास, आपल्या swami.mhane वर टाकण्यास; आनंदाने परवानगी देत आहे. ”  Unquote-
श्रीस्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी होते. त्यांची  अनुभवसंपन्न वाणी, त्यांच्या संपूर्ण साहित्यांत नवीन पिढीला प्रिय आचार सुलभ, साधन-सुलभ व गेय रूपांत प्रकट झाली आहे. श्रीस्वामींचं हेच खास वैषिट्य आहे. जड जंजाळ शब्द नाहीत,साधनेचं अवडंबर नाहीं.
श्री स्वामींच्या अध्यात्मप्रवण पिंडाचं संगोपन संस्कारक्षम गोडबोल्यांच्या धार्मिक कुळांत झालं.त्यांच्यांतील उपजत अध्यात्मपर प्रवृत्तीनां खतपाणी, त्यांच्या मुंबईतील शालेय जीवनांत मिळालं. मात्र त्यांच्या अध्यात्मिक जीवनाच्या वाटचालीला, मार्गदर्शन व योग्य दिशा, नाथसंप्रदायांतील सद्गुरू गणेशनाथ (बाबा महाराज वैद्य) यांच्या १९२३ मधें झालेल्या कृपानुग्रहानंतर मिळाली. स्वामी लिहितात-
“ पुण्य-पत्तनीं श्री सद्गुरूंनीं पथ-दर्शी होऊन । ‘ॐ तत्वं सोऽहं स:’ श्रुतिची दाखविली मज खूण ”।अ.धा.१३४।।
अनुग्रहानंतरच्या स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देतांना बाबा महाराज म्हणाले- “ आतां तुला जो थोडा वेळ अनुभव आला त्याचें दृढीकरण सोऽहं भावाचा सतत अभ्यास केल्यानें होईल व देहबुद्धीचें निराकरण होऊन तुला पूर्ण स्थितीचा अनुभव येईल. सोऽहं ध्यासानें देहबुद्धीचा निरास करून साक्षित्वानें राहा व यथोचित कर्में कर.” महाराजांच्या या उपदेशानें स्वामींचें समाधान झालें. सोऽहं चा ध्यास लागला व चित्त अखंड अनुसंधानांत रमूं लागलें.स्वामींच्या “असे सहज परि सोऽहंभावें करी सतत अभ्यास । हीच साधना जोंवरी न तो झाला मोह निरास ”।।अ.धा.२५।।
या साकीत सद्गुरूंचे वरील शब्द प्रतिबिंबित झालेले दिसतात. सं.गाथेच्या मंगलाचरणात गुरूपरंपरा सांगून स्वामी लिहितात “योग-सार ऐसें परंपराप्राप्त । सद्गुरू गणनाथ देई मज”।
ते सांगतात “अनुभविली सद्विद्या ही गुरू-परंपरा सांगितली ।शतकानुशतक प्रत्यक्ष जशी पुढती चालत आली ”।अ.धा.१३६।। विद्यारूप वस्तूच गुरूमूर्ती या माऊलींच्या अमृतानुभवातील व इतरत्र प्रकट सिद्धांताचाच पुरस्कार करीत मंगलाचरणाच्या दुसऱ्या कडव्यांत, मत्स्येंद्रनाथांना “ शिव-शक्ति-बीज ”
आदिनाथांनांकडून प्राप्त झाल्याचा सूचक उल्लेख करतात. नाथसंप्रदायांत “सद्गुरू” अथवा  “ गुरू ” या शब्दाला, या पदवीला अनन्यसाधारण महत्व आहे. “ शिव-शक्ति ” च्या सामरस्याकडे लक्ष वेधणारे हे शब्द, माऊलींच्या तत्वज्ञानाशी स्वामींच्या तादात्म्याचे निर्देशक आहेत.“ नसानसांतुनि तें संताचें नाचे अस्सल रक्त ” या ओळी हाच भाव प्रकट करतात.“ शिव-शक्ति ” यांच्या एकत्रीकरणांतून जे तत्व सक्रीय झालें तो आकार म्हणजे “गुरू” स्वामींच्या “गुरू तोचि देव” या अभंगाचा शेवटचा चरण हीच गोष्ट मनावर बिंबवतो. “स्वामी म्हणे वंदीं सद्गुरू -पाउले । भलें आकारलें पर-ब्रह्म ”।।
“सद्गुरू” व “ सोऽहं ”संबंधींच्या अनेक अर्थपूर्ण संदर्भांनी स्वामींचं साहित्य ओतप्रोत भरलेले आहे. ते आपण क्रमा -क्रमानें पाहाणार आहोत. उदा. “तों चि अवचित भेटला समर्थ । स्वामी गणनाथ कृपार्णव ।। सोऽहं मंत्र गुज सांगितलें कानीं । शब्दाविण ध्वनि ऐकविला।‘तत्वमसि’  महा-वाक्य विवरून । ॐ काराची खूण दाखविली ” ।।“ सद्गुरू गणेश । उपनामें वैद्य । तेणें स्वसंवेद्य ।आत्मरूप ।। दाखवोनि स्वामी । स्वरूपानंदास । कैवल्यपदास । पोंचविलें ।।"
या दृष्टीनें पाहिल्यावर मनांत येते, कीं “सोऽहं” साधना, “सोऽहं” भाव,“सोऽहं” बोध व शेवटी “सोऽहं” सिद्धी इ.सर्व छटा आणि आचार सुलभ माहिती, “अमृतधारा”,संजीवनी गाथा ” व “ भावार्थ गीता ” या स्वामींच्या ग्रंथांमधून आपल्याला मिळते. म्हणून हे तीनही ग्रंथ त्यांच्या “सोऽहं-हंसोपनिषद” दर्शनाची प्रस्थानत्रयी मानायला हरकत नाही माझ्यासारख्या आळशी शिष्याला समजावें या हेतूनें श्रीस्वामी काहीनां काही निमित्ताने शिकवत असतात.
आज श्री स्वामींच्या महासमाधीला ४३ वर्षे झाली. सगुणांत असतांना, सोऽहं संगीतात नित्य रममाण असणाऱ्या श्रीस्वामींच्या पवित्र स्मृतींनां त्रिवार वंदन.

ranadesuresh@mail.com             माधव रानडे
09823356958