Sunday, June 10, 2018

              “सोऽहं-हंसोपनिषद
                     अर्थात
       श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
           यांच्या साहित्यातील
              ( चाकोरीबाहेरचे )
        मराठीतील पहिले उपनिषद
                ( क्रमश :-११)


“चांगदेव पासष्ठी”क्र.६४ च्या सारभूत ओवी वरील
स्वामींच्या खालील अभंगांचे-
परमात्मा जैसा।स्वयें सच्चिद्घन।आनंद निधान।
परिपूर्ण॥आपण हि तैसें।व्हावें परिपूर्ण।तद्रूप होवोनी
सोऽहंभावें (१३०-३१)
                       
प्रतिरूप त्यांच्या स्वरुप पत्र मंजुषा पत्र क्र.६५/२-३
च्या पुढील दोन कडव्यांत दिसते-


स्वरुप चिन्मय आनंदघन ।आपणहि तैसेचि
परिपूर्ण।ऐसें भावितां तन्मय होवोन मनासी
मनपण उरे कोठें ?॥उरे कोठें द्वैत- स्थिति।
देह-गेह-जगत्-भ्रांति । क्षणैक अद्वयानंदानुभूति
देतसे शांति साधकासी॥


आणि हे साध्य करण्यासाठी काय करावे ते स्वामी
पत्राच्या सुरवातीलाच सांगतात-


“तुजलागीं संप्रदायें करोन।समंत्र सांगितलें
सहज-साधननित्यनेमें आसनीं बैसोन।   
करावें चिंतन स्वरुपाचें६५/१


अधोरेखित शब्दांकडे विशेष ध्यान द्यावे.वरील कडव्यांतील सांप्रदायिक खुणांचा व शब्दांचा खुलासा/संदर्भ “संजीवनी गाथे” तील अभंग २१ मधे स्पष्टपणे मिळतो. जसं-


    “सोऽहं मंत्र गुज सांगितलें कानीं।
शब्दाविण ध्वनि ऐकविला "॥सं.गा.२१/५॥


या गोष्टींची पुनरुक्ती करण्याचे कारण असं कीं
स्वामी नाथ संप्रदायाचे २० व्या शतकाचे केवळ थोर
वारसदारच नव्हते तर माऊलींनी लावलेल्या
“सोऽहं”, चा “सोऽहं-भावा” चा वेलु त्यांनीं गगनावर
नेला. सहज-साधन रुपात विकास करुन त्याचा
कल्पवृक्ष केला.


नाथ  संप्रदायामध्ये योगमार्ग प्रधान असल्याने योग
शास्त्रातील बऱ्याच संकल्पना या संप्रदायात रूढ आहेत.
नाथ संप्रदाय बद्दल स्वामी लिहितात-


“कृपावंत थोर सदगुरु उदार । तेणें योग-सार दिलें मज।
स्वामी म्हणे माझा नाथ-संप्रदायअवघें हरिमय योगबळें
सं. गाथा १२२/१-४


सिद्धांत म्हणून जरी शिव-शक्तीवर आधारित विचार
मान्य असला तरी हठयोगचा अवलंब करुन, आसन
प्राणायाम- चक्रध्यान इत्यादी मार्गाने जाऊन कुंडलिनी
जागृत करणे सर्वानांच शक्य होईल असं नाही.मग
इतरांनीं काय करावं
सहजयोगाच्या सोप्या मार्गाने, नामस्मरण आणि
ध्यानाच्या साहाय्यानेही कुंडलिनी जागृत करता येते हे
संतांनीं सोदाहरण दाखवून दिलें.
महाराष्ट्रातील नाथपरंपरेत, ज्ञानेश्वर माऊली व सांप्रत
श्रीस्वामींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे “ज्ञानेश्वरी”
‘हरिपाठ’ या ग्रंथांत माऊलींनीं नामस्मरण, आणि भक्ती
वर भर दिला.वडील बंधु सद्गुरू निवृत्तिनाथांकडून प्राप्त नाथ परंपरेचा वारसा जपत, चिद्विलासवाद व पंथराजाचं रोप लावलं. नाथसंप्रदाय भागवत भक्तीशी जोडला.
अगदी अशीच कामगिरी,अभंग-ज्ञानेश्वरी (य) च्या रुपानं
ईश्वरी संकल्प पूर्ण करीत स्वामींनी केली.
सोऽहं” भावा चे हे गोड झाड वाड केलें.


“मजसि ह्या जगद्-रंगभूमिवर जसें दिलें त्वां सोंग ।
करीन संपादणी तशी मी राहुनियां नि:संग ”
अमृतधारा ५१॥
स्वामींनीं, पारंपरिक चौकटीतून, “सोऽहं” साधना  मुक्त
केली व “सोऽहं” भावाची नवी दृष्टि दिली.
आपल्या सच्चिदानंद स्वरुपाची जाणीव ठेवून, प्रत्येकानें
“सोऽहं” भावाने सर्व प्राप्त कर्तव्यें, ईशपूजन या भावनेने,
उत्साहानें व अनासक्त बुद्धीनें करावीत असा स्वामींचा
उपदेश असे आणि तसे आचरणही असे.वाणी-करणी एक
व स्वानुभूति यामुळें त्यांच्या शब्दांत विलक्षण सामर्थ्य
आहे.
ते साच आणि मवाळ,मितुले आणि रसाळ शब्द
अंत:करणांत घर करतात. हृदयाचा ठाव घेतात.


“सोऽहं” भावा ची जणु व्याख्या असा हा अभंग


     “पाहों जातां मूळ अहंता तत्वतां ।
      उरे आत्म-सत्ता एकली चि ॥१॥
        तेथें अहं सोऽहं नुरे वृत्ति-भेद ।
        स्फुरे चिदानंद एकलाचि ॥२॥
       जाणीव नेणीव गळे द्वैत-भाव ।
          खेळे स्वयमेव पर-ब्रह्म ॥३॥
   स्वामी म्हणे मूळीं झाला वृत्ति-लोप
   विश्व आत्म-रुप तयालागीं॥सं.गा.२२०॥


मूळीं (सर्व विश्वाचें जें मूळ) झालेला वृत्ति-लोप,
निर्वृत्तिक भाव म्हणजे “सोऽहं” भाव.  “मूळ अहंता”
म्हणजेच आत्मा किंवा ब्रह्म यांचा शोध घ्यायला
जाणारा अंतत: त्याच आत्म-सत्तेशी एकरूप होतो.
अहं ‘सोऽहं’हा वृत्ति-भेद, जाणीव त्याच्या सापेक्ष नेणीव
व द्वैत-भाव गळून पडतो. अहं चं स्फुरण स्वदेहापुरतं मर्यादित न राहतां त्याचं विश्वस्फुरण होऊन विश्व आत्म-रुप होतं


साधनेच्या आरंभीच्या काळांतच, “स्वरुपीं विश्व -रूप"
पाहाणाऱ्या, स्वरुपाचा छंद व त्यांतच अवीट आनंद
लाभलेल्या, स्वामींच्या साधनेची परिणीती अशी झाली
यांत काय नवल ?


      “ स्वामी म्हणे चारी देहांतें निरसून ।
झालों आम्ही पूर्ण ब्रह्म-रुप”॥सं.गा.१७३/४


नित्य स्मरणीय, नित्य अनुकरणीय, सोऽहं- हंसावतार
सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरुपानंदांचे चरणी कोटी
कोटी वंदन.
               
 9823356958                            माधव रानडे.


ranadesuresh@gmail.com