Thursday, August 5, 2021

भक्ति तितकी प्राप्ति – २   

“स्वामी म्हणे भक्तीपासीं चारी मुक्ति।

भाग्या नाहीं मिति।भक्ताचिया॥” 172/4 

अनन्य भक्ती, भक्तिपंथ यांचा महिमा वर्णन करणारे, भक्तिरसपूर्ण, हृदयात घर करणारे मनाची पकड घेणारे, अनेक अभंग, साक्या स्वामी साहित्यात आहेत.  

“तैसी असे भक्ति।स्वभावें अद्वैतीं।जरी साहे ना ती ।क्रिया कांहीं ॥

परी हें तों नये ।दावितां बोलोन ।स्वानुभवें खूण।कळो येतीं॥अ.ज्ञा. १८/१९८०-८१॥ 

‘स्व-स्वरुपानुसंधानी रमो चित्त निरंतर’ असा वर जगदाधाराकडे मागत श्रीस्वामी

“वर-प्रार्थने” ची सुरवात करतात.माऊलीं प्रमाणेच स्वामींना अभिप्रेत असलेली भक्ती ही

अद्वैतातील प्रेमलक्षणा ज्ञानभक्ती आहे.  

आदि शंकराचार्यांनी हीच परा-भक्तिची दृष्टी “विवेकचूडामणि” नावाच्या अद्वैत वेदान्ता

चा पुरस्कार  करणाऱ्या त्यांच्या ग्रंथात इ.स.७९५ च्या आसपास “ “स्व-स्वरुपानुसंधानं

भक्तिरित्यभिधीयते” विधानाने स्पष्ट केली आहे भक्ति सूत्र १० मधे अनन्यतेची व्याख्या

महर्षि नारद,  “ अन्याश्रयाणां त्यागोsनन्यता ” अशी करतात. 

‘परमामृत’ हा मुकंदराजांचा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ, श्रीमद्भगवद्गीता, माऊलींची

‘ज्ञानेश्वरी’, समर्थांचा ‘दासबोध’, तुकाराम महाराजांची ‘गाथा’, सर्व एकच सांगतात कीं

अद्वैत आनंदाच्या तत्व-सुखाचा अनुभव केवळ शब्दांनी नाही तर अनन्य भक्तीनेच शक्य

आहे जी ‘मी’ च्या शोधांतील स्वरुपानुसंधानातून “सोऽहं” बोधाने होते. यासाठी श्रीस्वामी

सांप्रदायिक “सोऽहं” चें सहज साधन सांगतात. (स्व.प.मं. ६३-६४-६५) 

तैसा मी एकवांचूनि कांहीं । मग भिन्नाभिन्न आन नाहीं ।

सोऽहंबोधें तयाच्या ठायीं । अनन्यु होय ॥१८/१३९७ ॥ 

पण आपल्या ऋषीमुनींना, औपनिषदिक तत्वज्ञानाचे मनन, चिंतन, अभ्यास करणाऱ्या

पुर्वसुरींना, सद्गुरु श्री स्वामींनां अभिप्रेत अद्वैत भक्ति कृतीत आणून त्याचा अनुभव

घेऊन मित मधु बोलांनी मोहिनी घालणारा/री सत्कवी विरळच. श्रीस्वामींच्याच शब्दांत

सांगायचं तर - 

" तयांत विरळा सत्कवि निपजे अनुभवी जो निज - कविता।

सत्कवींत हि क्वचित् संभवे अनुभवुनी आचरिता॥अमृत-धारा॥८४॥”

सौ.मोहिनी नातु यांनां चैतन्यस्वरुप सद्गुरू श्रीस्वामी स्वरूपानंद (पांवस) यांचासांप्रदायिक अनुग्रह अधिकारी व्यक्तिकडून प्राप्त झाला. आणि अनन्य भक्ति व अढळश्रद्धा यांच्या आत्मिक बळाने त्यांच्या अंतरींच्या निज-गुजाला जे शब्दरुपी अंकुर फुटले तेमोहिनीने कणा कणांतुन, क्षणा क्षणातुन मनोवेधकपणे टिपले, साक्षात् योगेंद्राची साथमिळाली, संगीताचा प्रसाद मिळाला आणि मनात पिंगा घालणारे, एक जादुई संगीत,साज, स्वर, सूरांच्या आभुषणांनी नटलेंलं, (परफेक्ट टेन) परिपूर्ण दहाचं एक अजरामरलेणं, “ स्वरूपाचं देणं ” मधील निवडक दहा रचनांच्या रूपानं “ स्मृतिगंध ”ने दृक-श्राव्य माध्यमाच्या विश्व-पटलावर कोरलं. प्रत्येक सादरी/प्रस्तुती-करणात, काहींना काही नाविन्य आहे म्हपून या किमयागाराचं हे प्रासादिक संगीत कानांत रुंजी घालतं. हृदयांत घर करतं. दुग्ध-शर्करा योग तो हाच. 

“प्रशांत चर्या सस्मित वदन सहज आसन निवांत दर्शन” हे सद्गुरु स्वरूपानंद यांचे “स्वामी” मधील शब्दचित्र वाचुन/ऐकुन सौ. मोहिनीने त्यांना प्रत्यक्ष कधीही पाहिले नाही यावर विश्वास बसणार नाही.

 माझ्या डोळ्यांपुढे मात्र वर्षांनुवर्षे, चांगली आठवणारी किमान ३५ वर्षे, सदासर्वदा “सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन” वाले त्यांचे सुखदायी सगुण रूप तरळत राहिलं. 

“तुळशीचा लावा दिवा” ओवीने बालपणात नेलं. “अनंत-निवासा”तील विहिरी जवळच्या तुळशी समोर स्वास्थ्य ठीक असतानांचं, आंघोळीनंतर,अर्घ्यदेणाऱ्या सद्गुरुंचं डोळ्यांत साठवलेलं लोभस रुप आठवून स्वत:च्याच भाग्याचा हेवा वाटला.

“भानाच्याउंबरठ्यावर-” झालेले दर्शन ऐकणाऱ्याला बेभान करून भावावस्थेत नेऊन भारावून टाकतं.  

“गुरुपौर्णिमा” मधील - “ज्योतीने लागता ज्योत, प्रकाश फाकला चोहीकडे” “देव अन् भक्त असे रमले कायम ती पौर्णिमा” या ओळींनी सद्गुरू श्री स्वामींच्या अ.ज्ञा.१८/ २४५७-५८॥मधील “जैसा दीपें दीप।लाविला प्रकाशे। आलिंगन तैसें। तयांचें तें॥ आपणासारिखा।देवें केला पार्थ।देव-भक्त-द्वैत।न मोडितां॥ ची आठवण करून दिली 

“मृण्मयी पार्थिव - “देहाचे आवरण - “भानाच्या उंबरठ्यावर- “या व अशा निवडक रचनां मधील तळमऴ, आर्तता, लडिवाळ हट्ट, जादुई संगीतकार श्री प्रसाद जोशी यांनी नेमकी हेरली आणि या बावनकशी सोनेरी शब्दांनां उत्कृष्ट संगीत, वाद्यवृंद, स्वर, सुर यांच्या आभुषणांनी, अलंकारानी, वस्त्रालंकारानी अवगुंठित एखाद्या नववधु प्रमाणे सजवले. या अवलिया बहुवाद्य-निष्णात संगीतकाराची  दहा वेळां तर कवियत्री मोहिनी व तिच्या योगेंद्र यांची भेट देखील काही ठिकाणी होते.

मोहिनीच्या "स्वरूपाचे देणे” चे रसग्रहण करायचे तर श्रीस्वामी पुढे  लिहितात त्या प्रकारे करायला हवे -

“शब्दाची वरील। काढोनिया साल। गाभा जो आतील । अर्थरूप ||

त्याच अर्थब्रह्मी।होवोनि तद्रूप।सुखे सुखरूप। होआवें गा॥अभंग ज्ञानेश्वरी ६/१२४” 

पार्थिवाची कात टाकून, देहाचे आवरण गळून, मोहिनीने “स्वरूपाचे गाव” कधीच गाठल्याचं आपसुकच लक्षात येते आणि स्व.प.मं.६३/६पत्रांतील श्री स्वामी वचनाची  साक्ष पटते  -  

“निजभक्तां धेवोनि जवळीं।कृपाकटाक्षें कुरवाळी।

जेथींचा तेथें नेवोनि घाली।आनंद मेळीं स्वरूपाच्या॥”

सद्गुरू त्यांच्या भक्तांवर कृपेचा अखंड वर्षाव करीतच असतात, परंतु यद्वत्

झाडावरून खाली टाकलेले आंबे ते खाली जमिनीवर एकाग्रतेने, व  कुशलतापूर्वकझेलणाऱ्यालाच प्राप्त होतात, तद्वत् च सद्गुरूंच्या कृपेचे फळ अनन्य भक्तांच्या

झोळीतच पडते. 

चैतन्यस्वरूप सद्गुरूमाऊली श्रीस्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या चरणीं निर्लेप,नि:संग

समर्पणातुन त्यांच्या कृपेचे अक्षय “वरदान” प्राप्त केलेली, मीपण विसरलेली, मोहिनीदर्शक श्रोत्यांना नि:स्तब्ध करते. अंतर्मुख करते. 

जैसें बिंब तरी बचकें एवढें।परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें।शब्दाची व्याप्ति तेणें पाडें।अनुभवावी॥ज्ञा.॥ या माऊली उक्तीची, सद्गुरू कृपेची, रोकडी प्रचीती घ्यायची असेल, तर वाचक, श्रोते, दर्शकांनी, योगेंद्र - मोहिनी प्रस्तुत दहा ही व्हिडिओ पुढे दिलेल्या संकेत स्थळांवर अवश्य पहावे. https://youtube.com/playlist?list=PL1iamzWJmBfAyKi3KhU8dofYrV9tSPsUk

सद्गुरुंची “आरती” म्हणजे सीमापारचा उत्तुंग षटकार. ही उच्च कोटीची मानसपुजा

आहे. 

“स्वामी-म्हणे - पुस्तक छपाईची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर त्यात आणि एखादा लेख

सामील करीन असे स्वप्नातही वाटले नव्हते.

प्रेरणास्रोत चैतन्यस्वरुप स्वामी, ज्यांची प्रत्यक्ष भेट नाही, त्यांच्या अनन्य भक्तीचे

मोहिनीला प्राप्त हे फळ, माझ्या उद्देशाला पूरक असल्याने हा मोह आवरणं मला शक्य

झालं नाही. माझ्या ब्लॅाग लेखनाचा,सद्गुरूंवरील व्हिडिओ बनवण्याचा उद्देश केवळ

हाच आहे की जगाच्या पाठीवर जिथे कोठे मराठी भाषिक आहे, त्या सर्वांपर्यंत

स्वामींच्या साहित्य सोनियाचा खजिना व त्यांनीं दिलेला तारक सोsहं मंत्र

पोहोचवणे.

मोहिनी देखील हेच म्हणते - 

     “सोsहं सोsहं नादांतुनि या विश्व सारे डोलले, विश्व सारे डोलले.”

ही शब्दसुमने चैतन्यस्वरूप सद्गुरू सोsहं-हंसावतार स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांचे

चरणयुगुलीं सर्वभावे समर्पण!

माधव रानडे