Tuesday, April 24, 2018

              “ सोऽहं-हंसोपनिषद
                       अर्थात
        श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
              यांच्या साहित्यातील
               ( चाकोरीबाहेरचे )
           मराठीतील पहिले उपनिषद
                   ( क्रमश :- ९ )


या आधींच्या लेखांत शेवटी लिहिल्या प्रमाणें अति सुगम भाषेत ‘ज्ञानदेवां’ प्रमाणेंच आपणही प्रचलित मराठीत गीता-तत्वज्ञान रचावें ही स्वामींची इच्छा जगन्माउलीनंच सिद्धीस नेली. १९५१ च्या गुरुपौर्णिमेला “भावार्थ-गीता” प्रकाशित झाली. त्यांतील “सोऽहं” भाव पाहु-


निज-विस्मृतिची येतां निद्रा जीव-रुप होऊन।
   भव-स्वप्न हें पाहे आत्मा उपाधींत गुंतून ॥
 असे चि माझी सदैव सर्वां अंतर्यामीं वस्ती ।
         म्हणुनि स्फुरते प्राणि-गणांतें
            ‘मी अमुका’ ही स्फूर्ती ॥
संत-संगतीं सद्गुरू-भक्तिस्तव ती ज्ञान-प्राप्ति।
होतां घेई ‘अहं ’जयाचें पर-तत्वीं विश्रांति ॥      
‘सोऽहं’ तेंही जिथे मावळे द्रष्टा-दर्शन-दृश्य ।
  एकरूप तीं होती जाणे तो परमात्मा ईश ॥
   ज्ञानाज्ञाना-विरहित तैसे भावाभावातीत ।
 स्वत:सिद्ध तें तिथें संपतें द्वैत आणि अद्वैत ॥”   
    (भावार्थ-गीता- १५/५०,४१,४२,६१,५७)              


स्व-रुपाच्या विस्मृतिमुळे आत्मा जीव-रुप उपाधींत गुंतून त्या निद्रेत भव-स्वप्न पाहातो. ‘अहं ’ चे जे नित्य स्फुरण अंतरांत चालूं असते ते परमात्म्याचें स्फुरण आहे हा प्रत्यय येण्यास सत्संगति, योगज्ञानांत प्रगती, व विरक्तिपूर्वक सद्गुरूपास्ति,कारणीभूत होतात. अशा सत्कर्मांनी द्रष्टा-दृश्य-दर्शन त्रिपुटी एकरूप होते व जीव-अहंता मूळ अहंतेत विलीन होत तो ज्ञान अज्ञाना विरहित असा“सोऽहं”भाव अनुभवतो. स्वामींच्या याच विचारांचे प्रतिबिंब पुढील साक्यांत दिसते.


“ आत्मज्ञानें दूर सारुनी स्वर्ग-नरक-संसार।
  सोऽहं-भावें तन्मय होईं मद्रूपीं साचार ॥
  सोऽहं-भावें रत स्व-रुपीं जगद्भान विसरून। तुज उपासिती परमात्म्यातें दुजा भाव सांडून॥
सोऽहं-भाव-प्रचीत येतां सहज-संयमी झाला। आत्म-रुप जगिं एक संचलें हा दृढ निश्चय केला॥” (भावार्थ गीता-१८/११४ व १२/९,४७)      


“सोऽहं” भाव हे स्वामींच्या “सोऽहं-हंसोपनिषद
चे वर्म आहे, मर्म आहे.आणि जरी त्यात भाव हा शब्द असला तरी वस्तुत: ती अवस्था भावातीत द्वैताद्वैताच्या, ज्ञानाज्ञानाच्या, पलीकडची आहे.  


“भावार्थ-गीता” स्फुरण्याच्या, बरीच वर्षे आधीं पासून स्वामींना प्रभुदर्शनाचे डोहाळे लागले होते
कारण “भावार्थ-गीते” चं सृजन व्हायचं होतं.


        “ रुप चतुर्भुज तुवां चक्र-पाणि ।
            ध्रुवा मधु-वनीं दाविलें जें ॥
         तें चि देखावया भुकेले हे डोळे ।
          काय सांगों झाले उतावीळ ॥”
            (संजीवनी गाथा- ९२/१-२)


असा हट्ट ते लडिवाळपणे करीत होते.दिसांमासी त्यांची तळमळ वाढत गेली त्या भावात त्यांनीं खोलीत चतुर्भुज विष्णूची तसबीर लावून घेतली. स्वामींनां तशाच रुपात साक्षात्कारही झाला. जेंव्हा त्यांनां विचारलं कीं भगवंताचें दर्शन ही साधनेची इतिश्री ना ? तेंव्हा त्यांनीं सांगितलं कीं सर्व भूतमात्रांत परमात्मा पाहाणे आणि तसा तो दिसणें हे खरं भगवत् दर्शन.पुढील अभंग पहा


     तैसे त्याचे चित्त । काय सांगूं  फार ।
          देखे चराचर । मद्रूप चि  ॥
        मजपासोनियां  । कीटकापर्यंत ।
           एक भगवंत । दुजें नाहीं ॥
      तत्क्षणीं  मी विश्व-। रूप भगवंत ।  
        आकळें निभ्रांत । तयालागीं ॥
       ऐसें होता ज्ञान । मग आपोआप ।
          माझें विश्वरूप । दिसे तया ॥
       (अभंग ज्ञानेश्वरी ११/१३७२-७५)
मग त्यांना चतुर्भुज-रुप दर्शनाचा हव्यास का ? असा प्रश्न क्वचित् कोणाच्याही मनांत आलाच तर त्याचं उत्तर स्वामींच्याच साहित्यांत सापडते.


    “ स्वरूपाचा शोध घेतां अंतरांत ।
         देव प्रकटत एकाएकीं ॥
   मग आवडे त्या रूपीं देऊनि दर्शन ।
 करीतसे पूर्ण मनोरथ ”॥स्व.प.मं. ३३/७,९॥


आपल्या मनांतील प्रस्तावित गीता-तत्वज्ञानाला भगवान विष्णुंनीं ज्या कृष्णावतारांत प्रकट केलं त्याच परतत्वाचा परीस स्पर्श व्हावा. शिवाय,


      “ किंवा मधु-वनीं।ध्रुवाचिया गाला।
           शंखें स्पर्श केला। नारायणें॥
        तों चि वेदांची हि।खुंटे जेथें मति।
          ऐसी दिव्य स्तुति।करुं लागे॥”
          (अभंग ज्ञानेश्वरी ११/३८४-८५)


“ पाठवि येथें ती आम्हांतें मातेची नवलाई ।
चाकर आम्ही दिधल्या कामीं न करूं कधिं  
             कुचराई ॥” (अमृतधारा/१५९)


प्रारब्धवशात ज्या सारस्वत निर्मितीचा ईश्वरी संकल्प होता त्यांत कुचराई होऊ नये हा सद्हेतु


“ कर्म-विपाकें जाण मला गे लागे सावध-वेड।
जीवन्मुक्तास हि न चुकते प्रारब्धाची फेड॥”
                 (अमृतधारा-१२४)


       “ तयांच्याकडोन।कर्म-आविष्कार।  
           संस्कारानुसार।प्रारब्धाच्या॥
         तैसें चि प्रारब्ध-।संस्कारानुसार।
             मुक्ताचें शरीर।हालतसे ॥”
        (अभंग ज्ञानेश्वरी १८/७६२,७८७).   


स्वामींनीं तर प्रारब्धही हरीला अर्पण केलं होतं


     “ प्रारब्ध संचित आणि क्रियमाण ।
             हरीसी अर्पण करोनियां ॥१॥
         सुखें हरिपायीं राहिलों निवांत ।
           जाहलों निश्चिंत कर्माकर्मीं ॥२॥
        स्वयें आत्माराम वाहे योग-क्षेम ।
 ऐसें भक्त-प्रेम स्वामी म्हणे ”॥सं.गा.२७/३॥


स्वामींचे हेसोऽहं-हंसोपनिषदम्हणजे -
प्राप्त परिस्थितीत प्रयत्नपूर्वक परमेश्वरप्राप्तीचं पांवसच्या परब्रम्हरुप प्रेमदीपाचं, परमार्थाचे,   प्रयोगसिद्ध,पारदर्शक, प्रकट प्रवासवर्णन.


म्हणूनच ते आत्मविश्वासानं सांगतात कीं-


“प्रसन्न होतां माता हातां चढलें सोऽहं सार ।
हवा कशाला मला आतां हा वृथा शास्त्रसंभार”


9823356958                   माधव रानडे.
ranadesuresh@gmail.com
  
      


    


 
     
     



             




No comments: