Sunday, April 8, 2018

                          “ सोऽहं-हंसोपनिषद ”
                                 अर्थात
         श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यांतील
           ( चाकोरीबाहेरचे ) मराठीतील पहिले उपनिषद
                              ( क्रमश:- ८)

क्र.७ च्या लेखाचा ओघ अजाणताच स्वरुप पत्र मंजुषांतील पत्र क्र.६३,६४,६५ कडे वळला. ही तीनही पत्रं व ‘अमृतधारा’ तील ‘सोऽहं’ संबंधीच्या साक्या म्हणजे श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यातून प्रकट होणाऱ्या ‘ सोऽहं-हंसोपनिषद ’ या मराठीतील पहिल्या वहिल्या उपनिषदाचा पाया आहेत, हे खरं.
पण, त्या ओघात “अभंग-अमृतानुभव” आणि “अभंग-चांगदेव-पासष्ठी” या स्वामींच्या अनुवादित साहित्यांतील ‘सोऽहं-भावाचे’ संदर्भ पुढील लेखांत पाहूं, असं १९ जाने. क्र. ६ च्या लेखाच्या अखेरीस लिहिलं ती गोष्ट राहून गेली होती. त्याचा विचार करु-

“अमृतानुभव” या आत्म-संवादरुपी ग्रंथांत, “वाचा-ऋण-परिहार” या प्रकरण ३ मधे माऊली चारही वाचांचे ऋण, त्यांच्या मर्यादा व आत्म्याची झोप ह्या संकल्पना स्पष्ट करतात. मी म्हणजे माझा देह हा विचार सर्वसाधारण व्यक्तींच्या मनामधे तीनही अवस्थेत, जागेपणी, स्वप्नात व झोपेतही प्रबळ असतो. ह्या तीन अवस्थात वैखरी, मध्यमा व पश्यन्ति ह्या तीन वाणी सक्रीय असतात. आणि त्यावेळी हाच विचार प्रामुख्याने घोळत असतो. पूर्वसुकृतामुळे सत्संग घडला, विवेक व विचाराने, मी देहापुरता मर्यादित नाही हा विचार पक्का होऊन आत्म्याची झोप जरी उडाली, आणि नाभींतून उठणाऱ्या परा वाणीतील “सोऽहं” चा परोक्ष अनुभव आला तरी ‘अहं ब्रह्म’ ही द्वैतरुपी जाणीव रहातेच.

“अमृतानुभव” प्रकरण ३ च्या पहिल्या ओवीत माऊली लिहितात

       ययाचेनि बोभाटे । आत्मयाची झोप लोटे ।
      पूर्ण तरी ऋण न फिटे । जे चेणेचि नीद की ”।। ३.१ ।।
या ओवीचा अनुवाद स्वामींनी ६ अभंगात केला ते लिहितात-

        ‘सोऽहं’ ‘सोऽहं’ ऐसा। आळवितां शब्द ।
           जरी गेली नीद ।जीवात्म्याची ॥१॥
          आणि जरी जीवा। आलें जागेपण।
             जाणीव होवोन। शिवत्वाची ॥२॥
            तरी जागेपण। ती ही निद्रा साच।
             राहिली तैसीच। अहंता ती ॥३॥
            ज्ञान अहंता जी। ती ही घालवोन।
              स्वभावें गिळोन। ज्ञानाज्ञान ॥४॥
             जया आत्मरुपीं ।नित्य जागेपण ।
               भावें व्हावें लीन । तेथें जेंव्हां ॥५॥
             तेंव्हा चि ते साच । फिटे वाचाऋण ।
                 मौनासी हि मौन ।आपेंआप ॥६॥

मोक्ष मिळवण्यासाठी वाणीचा निश्चितच उपय़ोग होतो.वाणीची निर्मिती ही अविद्येमुळे होते.अविद्या म्हणजे स्वतःविषयी भ्रामक कल्पना.मी म्हणजे माझे शरीर व ते ब्रह्मापेक्षा वेगळे आहे ही ती कल्पना.ही संकल्पना भ्रामक आहे.मी ब्रह्मापेक्षा वेगळा नाही  माझी ब्रह्माशी एकरूपता आहे हे मी वाणीच्या सहाय्यानेच जाणतो. जगद्गुरू तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात-

  “ -।ऊर्ध्वमुखें आळविला सोऽहं शब्दाचा नाद   
    अरुप जागविला दाता घेऊनि छंद ”॥तु. गाथा॥४२६॥

अविद्येने निर्माण केलेली वाणीच अविद्येच्या नाशास कारणीभूत होते, अविद्याच नाहिशी झाली म्हणजे तिने निर्माण केलेल्या वाणीही नाहिशा होतात. या चार, (वैखरी स्थूल, बाकी तीन सूक्ष्म) वाणींचे स्थान स्वामी त्यांच्या पुढील अभंगात देतात.

          “ मूळ नाभि-स्थानीं जन्म पावे ध्वनि
             ती चि परा वाणी ओळखावी ॥१॥
              हृदयीं च जाण पश्यन्तीचें स्थान ।
                 कंठीं ओळखण मध्यमेची ॥२॥
                मुखें जो उच्चार वैखरी साचार ।
               ऐशा वाणी चार जाणोनियां ॥३॥
                     परेहुनी पर राहे परात्पर ।
        पाहे निरंतर स्वामी म्हणे ॥संजीवनी गाथा ४६/४॥”

परमात्मा परे-च्याही, अर्थात चारही वाणींच्या (पर) पलीकडे अशा शब्दांत स्वामी वाणींची मर्यादा दर्शवितात.

माऊलींनी ययाचेनि शब्द प्रक.२, अंतिम ८० ओवीच्या संदर्भात वापरला आहे. त्यांत ते सांगतात कीं श्रीगुरुंनां वंदन केल्यामुळें चारही वाचांची ऋणें फेडून मी ऋणमुक्त झालो आहे. प्रकरण ३ च्या क्र. ३३ या अखेरच्या ओवीतही माऊली परत तेच सांगतात. स्वामी त्यांच्या अनुवादात हेच अधिक खुलासा करुन लिहितात.  
अभंगांतील चरण ५ व ६ मधे हाच अर्थ अभिप्रेत आहे. सद्गुरु हे आत्मरुपीं नित्य जागे असतात. कारण त्यांची अहंता व दृष्टि आत्मस्वरुपी खिळून असते. म्हणून वाचाऋणमुक्त होता येते.

“जयांची अहंता।आत्मस्वरुपांत।राहिली निवांत।स्थिरावोनि॥ते तों स्वरुपीं च।ठेवोनियां दृष्टि।देखोनि किरीटी।मज तेथें ॥
                              ॥ अभंग ज्ञानेश्वरी १५/७६०-६१॥

स्वामींचे हे शब्द ज्ञानेश्वरीतील पुढील ओवीचे अभंगरुप आहे.
         “ येणेचि सत्कर्में। अशेषही अज्ञान विरमे।
          जयांचे अहं विश्रामे। आत्मरुपीं ”॥ज्ञाने. १५ /४२३॥

माऊली सांगतात की ४ वाणींच्या नादमय, ध्वनि लहरींच्या सततच्या गजराने (बोभाट्याने) जरी आत्म्याची झोप गेली (लोटे) म्हणजे असं कीं आत्मा आपले खरं स्वरूप विसरुन मी म्हणजे माझा जड देह, ‘देहोऽहं’ असा जो विचार करूं लागला होता-

“तैसा स्वरुपाचा।पडोनि विसर।होय देहाकार।चैतन्य जें ॥
मग देह चि मी।ऐसे मानी साच।पावोनि देहीं च।तद्रुपता ॥
जीव ऐसी संज्ञा।तयालागीं देती।स्वरुप-विस्मृति।घडतां च”          
                           ॥अभंग-ज्ञानेश्वरी १८/५७८-५८०॥

तो ‘कोऽहं’ च्या जिज्ञासेपोटी,मी देहाएवढाच मर्यादित नाही हे जरी समजला व ‘सोऽहं’ बोधावर आला तरी ते (चेणेचि) जागे होणे ही देखील एक प्रकारची निद्राच (नीद) होय. इतकाच फरक, की ‘देहोऽहं’ ही अज्ञानावस्थेंतील गाढ निद्रा आहे तर सोऽहं ही ज्ञान-जनित भ्रम-निद्रा आहे. जसं माऊली सांगतात कीं

“-।म्हणऊनि ज्ञानचि तें आंधारें।ज्ञानासि करी॥ज्ञा.९/१७३॥”

स्वामींचे पुढील अभंग पारमार्थिक प्रवासातील वेगवेगळ्या या सर्व अवस्थांचं व स्वरुप-स्थितीचं सटीक वर्णन करतात-

“‘अहं देह’ वृत्ति ।पावते विनाश ।येतां उदयास । आत्म-ज्ञान॥ अज्ञानाचा नाश।करोनियां ज्ञान।होतसे विलीन।आत्म -रुपीं॥  ‘अहं आत्मा’ ह्याही।वृत्तीची निवृत्ति। आत्म-रुप-स्थिति।ती चि जाण ॥ स्वामी म्हणे कैंची ।प्रवृत्ति निवृत्ति । शब्दातीत स्थिति स्वरुपाची ॥” संजीवनी गाथा २५५ ॥
स्वरुप महिमा वर्णवेना वाचेपुरे ना शब्दाचें बळ तेथें ॥विचाराचा डोळा होतसे आंधळा ।तर्क तो पांगळा ठरे जेथेंमना इंद्रियांचा काय तेथें पाड।शास्त्रांसी निवाड होये चि ना‘नेति’ वेद बोले तें चि म्यां देखिलें।गुरु-कृपा-बळें स्वामी म्हणे॥ संजीवनी गाथा- १२४/४॥
                                    ॥संजीवनी गाथा- १२४/४॥
श्रीस्वामींचे वरील अभंग शब्दातीताचें व गुरु-कृपेचें बळ सोप्या शब्दांत समजावतात. स्वरुपाचा महिमा वर्णन करणारे स्वामींचे हे शब्द आद्य श्री शंकराचार्यांच्या निर्वाण षटकाची आठवण करुन देणारे आहेत.

             “मनोबुद्धय्हंकार चित्तानि नाहं
                श्रोत्रजिव्हे न च घ्राणनेत्रे
             न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः
          चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम ॥१॥”

यांत प्रत्येक चरणाच्या शेवटीं “ चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम” मी सच्चिदानंदरुप आहे, असें म्हटलें आहे. पण हा मी अहंकाराचे रुप नाही हे पहिल्याच चरणांतील, “ मन, बुद्धि, अहंकार अथवा चित्त म्हणजे मी नव्हे या उल्लेखाने स्पष्ट होते. अहंकाराला जाणणारा हा मी अहंकाराहून साक्षीत्वानं वेगळा आहे.
“अभंग-अमृतानुभवा”मधे द्वंद्वातीतभूमिकेचा कठीण विषय स्वामी सोप्या आणि प्रासादिक भाषेत समजवितात. प्रकरण ३ व १० मधील काही ओव्या वानगीदाखल देऊन त्यावरील विचार देतो.
इथे हे नमूद करणं आवश्यक आहे कीं याचं प्रकाशन १९६२ ला नाथषष्ठीच्या मुहुर्तावर झालं पण यातील तत्व-विचारांचं बीज व १९३४-३५ सालच्या “अमृतधारे” त पहायला मिळतं कारण
स्वामीनीं १९३४ मध्ये अमृतधारेत लिहिल्याप्रमाणे “सोऽहं-भावें”  उडी घेतली अनन्तांत चौखूर” हा भाव त्यांचा स्थायीभाव झाला.

‘अहं ब्रह्म’ ज्ञान।स्वयें होय लीन।म्हणोनि तें गौण।वाटे आम्हां ॥जेथे ‘सोऽहं’ तें हि।जाय मावळोन।मोक्षाची ती खूण ब्रह्मभावीं॥अभंग-अमृतानुभव”३/५८-५९॥‘सोऽहं’ तें हि अस्तवलें तें नाही भोगिलें माते ।‘सोऽहं’-दर्शन अनुभविलें तें लिहूनि ठेविले येथें ॥अमृतधारा १५५॥
आठव-नाठव।गेले भावाभाव।तयाची अपूर्व।आत्मस्थिती॥अभंग-अमृतानुभव १०/५८ “आठव नाठव नुरे स्वभावे स्फुरे एकलें एक ।॥अमृतधारा ६९॥
देव चि तो भक्त।होवोनि राहिला।भक्त चि तो झाला।देव आतां॥ऐसें एकपण।देव-भक्तां जेथें।राज्य करी तेथें।अक्रिय हा॥” अभंग-अमृतानुभव १०/६४ ६५.
“ आला अनुभव देव तूं तसा भक्त हि तूं स्वयमेव।अ.धा.१५६॥

हे वाचून पटेल कीं स्वामींनीं त्यांचे पुढील विचार कृतीत आणले

       “क्षणांत येते मनांत माझ्या ‘ज्ञानदेव’ होऊन ।
       प्राकृतांत अति सुगम रचावें गीता-तत्वज्ञान ॥”

“सोऽहंभाव” संगीतात नित्य रंगून राहिलेल्या “सोऽहं-हंसो पनिषदा” च्या या उद्गात्याला कोटी कोटी वंदन.

ranadesuresh@gmail.com            माधव रानडे
    


No comments: