Friday, April 8, 2016

                          श्रीस्वामींच्या “ अमृतधारा ”
                                       भावार्थ-विवरण.(1)
                                     
श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या “ अमृतधारा ” या १६२ साक्यांच्या संग्रहाला “ दिव्यामृतधारा ” ( श्री संत बाबा महाराज आर्वीकर यांच्या ग्रंथाशी याचा संदर्भ नाही ) म्हणावं लागेल एका वेगळ्या अर्थानं. कारण त्याला दिव्यत्वाचा स्पर्श आहे. “आत्म्याची काळोखी रात्र ” Dark Night of The Soul या अग्निदिव्याचा अनुभव घेतल्यानंतरच्या, दिव्य स्फुरणातून, उमटलेले हुंकार आहेत हे.
श्री स्वामींना इ.स. १९३४-३५ नंतरच्या पुढील ४० वर्षात त्यांच्या मार्फत होणार्या त्यांच्या अवतार कार्याचे संकेत या संग्रहाच्या लेखन काळात मिळालेले व त्यांनी अनेक साक्यां मधून स्पष्ट होते. निःसीम भक्ताला असे दिव्य संदेश मिळाल्याची उदाहरणं आहेत.  
मात्र ही केवळ “ नोस्त्रादमास ” सारख्यांनी केलेल्या भाविष्यवाणी सारखी नाही, तर एका आत्मज्ञ, योगिवर भक्ताने पुढील ४० वर्षात उलगडणाऱ्या नाट्याची, स्वहस्ते लिहिलेली संहिता आहे. नाट्य लिहिण्याचे कारण असं की श्री स्वामीच म्हणतात “ नटलो मी परि तुझाच कामी त्या होता ना हात ” (अ. धा. ५०) किंवा “ मजसि ह्या जगद-रंगभूमिवर जसें दिले त्वां सोंग ” (अ. धा. ५१) इ.
श्री स्वामींच्या वरील साक्या  आपण केवळ माध्यम असल्याची जाण आणि भान सतत असणार्या जगन्माउलीच्या  एका निःसीम भक्ताच्या आहेत.  १६३२ ते १६७७ मध्ये होऊन गेलेल्या  Baruch Spinoza या  Dutch philosopher च्या पुढील उद्गारांची आठवण करून देणाऱ्या आहेत. “ We are both actors and spectators in this drama of existence / Universe ”
इतर सर्व दैवी गुणांबरोबरच कमालीचा विनय, लीनता, अनाग्रही वृत्ती व अमानित्त्वाच्या मूर्तिमंत पुतळ्याने भविष्यातील घटनांच्या आधीच लिहिलेलं हे आत्मवृत्त पराकोटीच्या संयमी स्वभावामुळे,  “ “आधी केले मग सांगितले” या न्यायाने, कटाक्षाने प्रकाशांत आणल नाही, येऊ दिले नाही.   
श्री स्वामी यांचे चरित्र व साहित्य या बाबतच्या  माझ्या चिंतन- विचारांना मी माझ्या या Blog वरील लेखांद्वारे २००७ पासून, गुरुसेवेच्या दृष्टीने, माझा खारीचा वाटा म्हणून प्रकट करतआलो आहे.
या विषयावरील, स्वतःचे वैयक्तिक विचार स्वतंत्रपणे प्रकट करण्यासाठी, व देश परदेशांतील जास्तीत जास्त वाचकांपर्यंत श्री स्वामींनी त्यांच्या साहित्यांतून साध्या, सोप्या व प्रचलित मराठीतून विशद केलेलं गीता व ज्ञानेश्वरीचं अद्वैत तत्वज्ञान, पोचविण्याचं एक प्रभावी व्यासपीठ म्हणून मी या माध्यमा चा उपयोग करत आहे, व श्री स्वामीकृपेन तसं होतांना पहायलाही मिळतंय.          
“ Be a gentleman and God is yours for sure " या “ अमृतधारा ” मधील साकी क्र. ९६ व ९७ वर डिसेंबर २००९ मध्ये इंग्रजीत लिहिलेल्या एका स्वतंत्र लेखात तसेंच, " अभंग- ज्ञानेश्वरी(य) ” ( एक ईश्वरी संकल्प) या १५/०८/२०१४ ला लिहिलेल्या लेखात मी  " अमृतधारा " चा उल्लेख मोघमपणे केला आहे.
पण यावेळी या संग्रहाबद्दल श्री स्वामी प्रेरणेने एक वेगळा विचार मनांत आला, तो व्यक्त करण्याचा मानस आहे. माझे प्रेरणास्थान,अर्थातच माझी गुरुमाउली स्वामी स्वरूपानंदच आहेत.
श्री स्वामींची तपोभूमी, “अनंत -निवास”, हे पांवस येथील देसाई कुटुंबाचं निवास स्थान, हे माझ्या आईचं, सौ.रमाबाई (बनुताई) रानडे हिचं माहेर, ओघानं माझं आजोळ. श्री स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या त्या वास्तूंत, त्यांच्या आगमनानंतर,सुमारे ४ll वर्षांनंतर माझा जन्म झाला.
             “ हेचि पुण्यफळ l लाधलो सकळ  l जन्मोनि केवळ l त्या वास्तूत ll  
यामुळे मला समजायला लागल्यापासून तर १९६८ पर्यंत “आप्पा ” म्हणून, १९६८ साली मला लाभलेल्या सांप्रदायिक अनुग्रहानंतर, “गुरु तोचि देव” या भावनेतून साकारलेल्या सगुण ब्रम्हरूपांत, तर १५ ओगस्ट १९७४ ला श्री स्वामींच्या समाधीनंतर आजतागायत चैतन्यरूप निर्गुण ब्रह्मरूपाने अशा तिहेरी सहवासाचा लाभ मला मिळाला.
चैतन्यस्वरुप श्रीस्वामींच्या सहवासाला तर देश-स्थल-काल या कशाचंच बंधन नसल्याने तो तर  नित्याचाच झाला आहे आतां.
खरं तर श्री स्वामींच्या समाधीनंतर मनाला सतत रुखरुख होती की आतां त्यांचं दर्शन, सहवास, उपदेश या सर्वांला आपण मुकलो. पण श्री स्वामींच्या समाधीनंतर एका स्वामिभक्ताबरोबरील त्यांच्या सोsहं साधनेसंबंधातील प्रश्न-उत्तराने शंका दूर केली.  
प्रश्न होता की प्रत्यक्ष दर्शन केंव्हा होतं? अन स्वामींनी उत्तर दिलं होतं की सान्निध्याची जाणीव हे दर्शनच नव्हे काय ? क्षणभर होणार्या बाह्य दर्शनापेक्षा अंतरी होणारे हे दर्शन जास्त वेळ टिकते. रोज होते.
मला स्वतःला आलेल्या अनेक अनुभवांनी मला त्याची खात्री पटली व त्याचं टिपण ”जेथे जातो तेथे”
या १५ डिसेंबर १९८१ रोजी  “गायत्री” प्रकाशन तर्फे प्रकाशित झालेल्या मझ्या पुस्तकात आहे. या माझ्या पुस्तकाच्या हस्तलिखिताचे पहिले वाचक होते माझे मामा वै. र. वा. ऊर्फ भाऊराव देसाई. पुस्तकाला प्रस्तावना मराठीतील सिद्धहस्त, “अमृतसिद्धी” या श्री स्वामींच्या चरित्रात्मक कादंबरिच्या प्रसिद्ध  लेखिका श्रीमती मृणालिनी जोशी यांची आहे.  
हे सर्व लिहिण्याचं कारण की, आज जवळ जवळ ३४ वर्षांनी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती २७ जाने २०१६ ला “ स्नेहल प्रकाशन ” पुणे यांचे तर्फे प्रसिद्ध झाली. यामागील कारण मी ह्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत दिले आहे.               
" अमृतधारा " या संग्रहातील सर्व १६२ साक्यांचं लिखाण २७ नोव्हें १९३४ ते ७ मार्च १९३५ या १०१ दिवसांच्या कालावधीत घडलेलं आहे. श्री स्वामींनी इंग्रजी मध्ये लिहिलेली दोन कडवीही  
Nourished by the Nectar of thy Knowledge, Clad in the Robe of Thy Love,
Before Thee I dance, O Mother, in the Temple of Eternity."  हे इंग्रजीतील कडवं २० मार्च ला तर या आधीची इंग्रजीतील दोन कडवी ७ मार्च १९३५ ला लिहिली.
मात्र या संग्रहाच्या प्रथमावृत्तीचं प्रकाशन शके १८८४ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच इ.स. १९६२ च्या जुलै महिन्यांत, अथवा त्या सुमाराला, सूर्यकांत विठ्ठल देवळेकर, बाजार पेठ, यांचे मार्फत झाल्याचे मला माझे मेहुणे व ज्येष्ठ गुरुबंधु श्री श्रीराम लिमये ( श्री स्वामींचे गुरुबंधु वै काकासाहेब लिमये यांचे चिरंजीव) यांचेकडून समजले.  
लेखनकाल व प्रकाशन काळ यामधील जवळ जवळ २७ वर्षांच्या मोठ्या अंतरालाची कारण मीमांसा, श्री स्वामींचे स्वभाव विशेष, व स्थायी भाव लक्षात घेतां व साकल्याने विचार करता त्यांच्याच पुढील १९७४ मधील उद्गारांत पाहायला मिळते. “ आज कालचे नहोच आम्ही, माउलिंनेच आम्हाला इथे पाठवलं दिलं काम तिच्याच कृपेने पुरं झालं   ” ( स्वा.स्व.जी. पृ २८४ ) हे व साकी १५८-१५९ मधील शब्द    
१९३४-३५ ते १५ ऑगस्ट १९७४ मध्ये घडणारया अवतार कार्याची त्याच्या महानायाकाने स्वहस्ते आधीच लिहिलेली हि संहिता आहे. आणि या सार्याचे “ अनंत निवासातील ” कानाकोपरा, देसाई परिवारातील सर्व सदस्य,अनेक स्वामीभक्त साक्षीदार आहेत एव्हढंच नाही तर त्या नाट्यातील सवंगडी आहेत.
मला “ अमृतधारा ” अशी भावली म्हणून हे भावार्थ विवरण. २९ जून २००९ मध्ये मी सेवा मंडळाला “भावार्थ गीता प्रचार-प्रसार” निधी एकत्र / खर्च करण्यासाठी पत्राद्वारे प्रस्ताव पाठविला होता व निदान बाराव्या अध्यायाची सी डी काढण्याचा आग्रह केला होता व तशी एक सी डी बनली देखील. त्यामध्ये जागा असल्याने “ अमृतधारेतील ” काही साक्या घालण्याचे व निवेदन करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले होते. १६२ मधील फक्त ७५ निवडायच्या होत्या. खूप विचार करूनही काही सुचत नव्हते मग श्री स्वामींना शरण गेलो. त्यांनी सांगितलं की ते जर ९०३३ ज्ञाने च्या ओव्यांमधून १०९ काढू शकतात तर यात काय अवघड आहे ? व काम सोपं झाले. ७५ साक्या निवडल्या त्यांचा स्वामी प्रेरणेन क्रम बदलला व सी डी तयार देखील झाली. “अमृतधारेतील ” साक्यांची ही पहिली सी डी  त्यावेळी केलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे “ अमृतधारा ” म्हणजे  एका जगन्मातेच्या भक्ताचा मातेबरोबरचा लडिवाळ संवाद, एका   साधकाच हृदगत, एका सिद्धाच स्वगत, एका जागृत भक्ताचं सोsहं संगीत, एका अमर्त्य आनंदयात्रीच मनोगत, एका जीवन्मुक्ताच आत्मवृत्त असं बरंच काही आहे.
कोणत्याही चित्रपटाला अथवा नाटकाला तो यशस्वी होण्यासाठी, एक सशक्त कथानक आवश्यक असतं.  त्याचा एक लेखक असतो. चित्रपट पडद्यावर व नाटक रंगभूमीवर येऊन ते लोकप्रिय होण्यासाठी त्याला, चांगल्या निर्माता व दिग्दर्शकाची, मिळालेली भूमिका उत्तम वठविणार्या सक्षम कलाकाराची, व लक्षवेधी शीर्षकाची आवश्यकता असते.
ह्या दृष्टीने श्री स्वामींच्या “ अमृतधारा ” या १६२ साक्यांच्या संग्रहाकडे, अवतार-नाट्याकडे /कार्याकडे  पाहिलं असतां मला असं वाटतं की या तीन अंकी नाटकाचं नांव आहे “ अभंग-ज्ञानेश्वरी (य) (एक ईश्वरी संकल्प ) ”, त्याचा पहिला अंक आहे “अभंग-ज्ञानेश्वरी”, दुसरा “अभंग-चांगदेव-पासष्टी” व तिसरा अंक आहे,  “अभंग-अमृतानुभव”. तिसर्या अंकाची पूर्तता / प्रकाशन, नाथशष्टी (फाल्गुन-वद्य ६) १८८४ म्हणजे इंग्रजी तारखेप्रमाणे सुमारे मार्च १९६२ ला झाले व तिसरी घंटा वाजून पडदा उघडल्यावर, लगेचच काही दिवसांत,   “ अमृतधारा ” या संग्रहाच्या प्रथमावृत्तीचं प्रकाशन शके १८८४ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच इ.स. १९६२ च्या जुलै महिन्यांत, अथवा त्या सुमाराला,करायला श्री स्वामींनी संमति दिली.
या नाट्याची निर्माती व दिग्दर्शक साक्षात जगन्माउली आहे तर साहाय्यक निर्माता व दिग्दर्शक ज्ञानेश्वर माउली व श्री स्वामींची गुरुमाउली आहेत. “भावार्थ गीता” “संजीवनी-गाथा” ह्या रचना या नांदी आहेत.                  
नवीन वर्षाच्या प्रथम दिवशी, गुढी पाडव्याच्या दिवशी, सद्गुरु माउलीच्या साहित्य प्रचार-प्रसार सेवेची गुढी उभारण्याची मनापासून फार इच्छा होती ती घडल्याचा आनंद आहे.
“ असो, भक्ताचे मनोगत । पुरवितां श्रीसद्गुरु समर्थ । देवभक्त ऐसें द्वैत । दावोनी खेळत, स्वयें तोचि ।। ”   
ranadesuresh@gmail.com                                                              (स्वपमं ३७/५)
९१९८२३३५६९५८
                                                                                                 माधव रानडे.                     

No comments: